Header Ads

  • ताजा खबरें

    डोंबिवली येथील मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हा प्रांतीय हिंदू अधिवेशनात एकवटल्या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना


    सज्जनांनी साधना करून आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी संघटित  व्हावे ! -  रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह

        डोंबिवली - हिंदु धर्म महान आहे. धर्माने दिलेली तत्त्वे आचरणात आणली तर व्यावहारीक आणि पारमार्थिक उन्नत्ती होते. हिंदु धर्म कधीही आतंकवाद निर्माण करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुलदेवता नामजप आणि गुरुंचा आशीर्वाद यांमुळे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. सध्याच्या काळात दुर्जन संघटित आहेत. तसे सज्जनांनीही साधना करून आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी संघटित व्हावे, असे आवाहन पितांबरी उद्योगसमुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले. 23 नोव्हेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचे प्रांतीय हिंदू अधिवेशन घेण्यात आले.

        डोबिंवली येथील ‘एव्हरेस्ट’ सभागृहात पार पडलेल्या या प्रांतीय अधिवेशनाला प्रसिद्ध लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, पू. संगीता जाधव  ज्येष्ठ लेखक श्री. दुर्गेश परूळेकर यांची उपस्थिती या अधिवेशनाला लाभली. या अधिवेशनाला बजरंगदल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राजे प्रतिष्ठान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, योग वेदांत समिती, करणी सेना, हिंदू युवा वाहिनी, गोवंश रक्षा समिती, सनातन संस्था, लष्कर-ए- हिंद यांसह स्थानिक संघटना तसेच शिवसेना, भाजप या राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये अधिवक्ता, डॉक्टर, पत्रकार, उद्योजक यांचा सहभाग होता. या वेळी अन्य मान्यवरांनीही त्यांचे विचार मांडले.
    ‘पुरोगामी’ म्हणजे शिवी ठरेल, अशी स्थिती पुरोगाम्यांनी करून ठेवली आहे ! - डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रवचनकार
    कथित पुरोगामी आणि नास्तिकतावादी मंडळी यांच्याकडून बहुसंख्य हिंदूंमध्ये भारतीय संस्कृती, हिंदूंच्या प्रथा परंपरा यांविषयी घृणा निर्माण करण्याचे काम सामाजिक संकेतस्थळे तसेच अन्य माध्यमांद्वारे पद्धतशीरपणे केले जात आहे. हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सद्यस्थितीला; मात्र पुरोगाम्यांनी आपली स्थिती अशी केली आहे, की आज पुरोगामी ही शिवी ठरू लागली आहे.
     आम्हाला राजकीय नव्हे; तर धर्माधिष्ठीत हिंदु राष्ट्र हवे ! - सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
        उल्हासनगर मध्ये 1 लक्षहून अधिक सिंधी बांधवांचे धर्मपरिवर्तन झाले आहे. ख्रिस्ती मिशनरी प्रत्येक वर्षाला 8 लक्ष हिंदूंचे धर्मपरिवर्तन करत आहेत. काही संघटना म्हणतात, आजमितीला पंतप्रधान, राष्ट्रपती  तसेच अनेक राज्यांचे मुख्यमंत्री हिंदू आहेत, मग भारत हे हिंदु राष्ट्र नव्हे काय ? मात्र आम्हाला असे राजकीय हिंदु राष्ट्र नको, तर धर्माधिष्ठीत हिंदु राष्ट्र हवे आहे, यासाठी सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करूया.
        अधिवेशनाच्या शेवटी उपस्थित सर्व हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध राहू, अशी प्रतिज्ञा केली. संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ ने अधिवेशनाची सांगता झाली.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad