Header Ads

  • ताजा खबरें

    ज्यांना विकास दिसत नाही; त्यांना मोतीबिंदू झालाय- परांजपे

    मुंब्य्रात बुथपासून विधासभाध्यक्षपदापर्यंतची कार्यकारिणी गठीत

    मुंब्रा हे विकासाच्या बाबतीत आदर्श ठरणार- आ. आव्हाड 

    मुंब्रा (प्रतिनिधी)- मुंब्रा शहर आणि इतर भागात सध्या विकासाचे वारे वाहत आहे. मुंब्रा भागातील नागरी समस्या निकाली निघत आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात मुंब्रा हे विकासात्मक कामासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास कळवा- मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. तर, आमदार आव्हाड यांना या मतदारसंघातून एक लाखांच्या मताधिक्याने विजयी करण्याची आमची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी निश्चिंत होऊन राज्यभर दौरे करावेत; राज्यात राष्ट्रवादीचे बळ वाढवावे, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी म्हटले. 
    मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी संपन्न झाला. त्यावेळी आ. जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे हे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या  बूथ, वॉर्ड, ब्लॉक अध्यक्षापासून विधानसभाध्यक्षपदापर्यंतच्या कार्रकारिणीची नियुक्ती करुन या सदस्यांना पदनियुक्ती पत्र देण्यात आले.  यावेळी शमीम खान यांची तिसर्‍यांना विधानसभा क्षेत्राधध्यक्षपदी निवड करण्यात आली.  या मेळाव्यास सय्यद अली अश्रफ,  मुंब्रा प्रभाग समितीच्या अध्यक्षा अनिता किणे, ॠता आव्हाड,  नगरसेवक शानू पठाण, सिराज डोंगरे, राजन किणे, मोरेश्वर किणे, सुनिता सातपुते, रुपाली गोटे, मेराज खान, फरजाना शेख, आशरीन राऊत, जफर नोमानी, हाफिजा नाईक, आजीज बाटा, नादीरा सुर्मे, सुलोचना पाटील, बाबाजी पाटील, साजिया अन्सारी, जमीला नासरि शेख  यांच्यासह अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थि होते. 
    यावेळी आ. आव्हाड म्हणाले की,  कधीकाळी मुंब्रा हे अविकसीत शहर म्हणून ओळखले जात होते. आज या शहराला मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. येथील रस्ते,  पाणी, कचरा आदी समस्यांचा निपटारा झाला आहे. लवकरच हे शहर विकासाच्या बाबतीत रोल मॉडेल होणार आहे. या विकासकामात कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ आपणाला लाभत आहे.
    शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी आपल्या भाषणात संघटनात्मक बांधणीवर अधिक जोर दिला. आ. आव्हाड यांच्या प्रयत्नामुळे मुंबरा विकसीत होत आहे. मात्र, काही नगरसेवकांना रस्त्यावरची माती फेसबुकवर टाकण्यात मजा वाटत आहे. त्यांना विकास दिसत नाही. या लोकांना मोतीबिंदू झाला असून त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी लागवला. आगामी काळात वॉर्ड अध्यक्षापासून शहराध्यक्षापर्यंत आणि पक्षाच्या सर्वच विंग हातात हात घालून काम करणार आहेत. त्यामुळे आ. आव्हाड यांचा एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने विजय निश्चित आहे. त्यांनी पक्षाची राज्यातील ताकद वाढवण्यासाठी राज्यभर दौरे करावेत. मुंब्रा- कळवा मतदारसंघाची धुरा सांभाळण्यास आम्ही आहोत. कारण, सन 2019 मध्ये राष्ट्रवादीचीच सत्ता येणार असून आ. आव्हाड यांना गृहखातेच मिळणार आहे. म्हणून त्यांनी येथे बघू नये. आम्ही सक्षम आहोत, असा शब्द यावेळी आ. आव्हाड यांना परांजपे यांनी दिला. 
    दरम्यान, कळवा- मुंब्रा विधासभाक्षेत्राध्यक्ष शमीम खान यांनी, आता कळवा- मुंब्रा भागात राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज कार्यकारिणी गठीत करुन नियुक्ती पत्र देण्यात आले असले तरी या सर्वाांंमागे मोठी ताकद आहे. या सर्वांनी आपली जबाबदारी  ओळखून काम केले पाहिजे, असे आवाहन केले.आज मुंब्रा येथे  दोन पक्ष असे आहेत की ते आ. जितेंद्र् आव्हाड यांना पराभूत करण्याची भाषा करीत आहेत. मात्र, त्यांच्या मोर्चात 13 जण तर धरणे आंदोलनात 24 जण असतात. अशा लोकांनी आ. आव्हाडांना हरवण्याची स्वप्ने पाहण्यापेक्षा स्वत:चे डिपॉझिट कसे वाचेल, याचा विचार करावा, असा टोला लगावला.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad