बदलापूर स्टेशन ते शाश्वत पार्क - दिपाली रिक्षा स्टैंडसाठी रिक्षाचालक मनमानी भाडे आकारतात! -प्रवाशांची तक्रार
बदलापूरः- नुकताच अंबरनाथ वाहतुक विभागामार्फत मनमानी कारभार करणार्या तसेच मुजोरी करणार्या रिक्षाचालकांवर कडक कारवाई करण्यात आल्याने बदलापुरातील रिक्षाप्रवाशी देखील आता जागृक झाल्याचे समजते.
बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशन पासुन मांजर्ली शाश्वत पार्क किंवा दिपाली पार्क रिक्षा स्टैंडपर्यंत जाण्यासाठी मुजोर रिक्षाचालक मनमानी भाडा आकारत असल्याचे प्रवाशांची तक्रार आहे.
मांजर्ली येथील एका महिला प्रवाशीने बदलापूर विकासशी बोलतांना सांगितले कि, स्टेशन ते शाश्वत पार्क किंवा दिपाली रिक्षा स्टैंड पर्यंत शेअरींगसाठी 10 रुपये तसेच प्रायवेटसाठी 30 रुपये आकारले जाते परंतु सध्या काही दिवसांपासुन रिक्षा चालकांनी मनमानी भाडा आकारण्यास सुरुवात केल्याने प्रवाशांची लुट होत आहे. विशेष म्हणजे शेअरिंग रिक्षासाठी जोवर 4 किंवा 5 प्रवाशी होत नाही तोवर रिक्षाचालक आपली रिक्षा सुरु करत नाही. नियमाप्रमाणे रिक्षाचालक व तीन पेक्षा जास्त प्रवाशी रिक्षातुन नेणे वाहतुक नियमांचे उल्लंघन असतांना कायद्याची कोणतीही भिती न बाळगता 4-5 प्रवाशी होईपर्यंत रिक्षा चालवली जात नाही. तसेच शेअरिंग मध्ये 4-5 प्रवाशी बसवता येते म्हणुन प्रायवेट भाडा एक तर नाकारला जातो अन्यथा 30 ऐवजी 40 किंवा 50 रुपये सांगत प्रवाशांची लुट केली जात आहे.
याबाबत अनेक प्रवाशांनी अंबरनाथ वाहतुक विभागाकडे तक्रार केली असुन अद्याप मनमानी भाडा आकारणे थांबलेले नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

No comments