नाना चुडासामा यांच्या निधनाने मुंबईच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाशी एकरुप झालेले व्यक्तिमत्त्व हरपले - मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. २३ : मुंबईचे माजी नगरपाल आणि जायंटस् इंटरनॅशनल या जागतिक स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक नाना चुडासामा यांच्या निधनाने मुंबईच्या सामाजिक - सांस्कृतिक विकासाचा ध्यास असणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, नाना चुडासामा हे मुंबईच्या समाजजीवनाशी खऱ्या अर्थाने एकरूप झाले होते. विविध संस्था, संघटना आणि उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी या महानगराच्या सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. विशेषतः मुंबईच्या नगरपाल पदाला त्यांनी कृतीशीलतेचा आयाम दिला. जायंटस् इंटरनॅशनलसारख्या संस्थेच्या रुपाने समाजसेवेसाठी एक व्यापक व्यासपीठ उभारण्यासाठी केलेली धडपड त्यांच्या सामाजिक बांधिलकीची प्रचीती देणारी होती. देशातील विविध चर्चित विषयांवर दोन ओळींमध्ये नियमित आणि मार्मिक भाष्य करणारे नानांचे मरिन ड्राइव्ह येथील बॅनर हे त्यांच्यातील परखड भाष्यकाराची प्रचीती देणारे होते.
मुंबईचे माजी नगरपाल आणि जायंटस् इंटरनॅशनल या जागतिक स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक नाना चुडासामा यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी त्यांच्या कुटुंबियांची मलबार हिल येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, श्री चुडासामा यांच्या कन्या शायना एनसी व कुटुंबिय उपस्थित होते.

No comments